प्रवास तिचा…..

स्त्री च्या आयुष्याला नवे वळण देणारा भाग्याचा दिवस आज मीरासाठी उजाडला होता. अर्थातच आज तिचे लग्न आहे. त्यामुळेच मीरा खूप आनंदी होती.

मीरा… अगदी साध्या स्वभावाची, समजूतदार आणि मनमिळाऊ मुलगी.. कायम हसऱ्या चेहऱ्याची. सावळीशी ; उंचीला शोभेल अशी शरीरयष्टी. मीराने जन्मतः आपल्या आईला गमावले होते. घरातील एकुलती एक मुलगी.. आई सोडून वडील, आजी, आजोबा ,काका-काकू असं भरगच्च कुटुंब होत तिचं.. मात्र लहानपणापासूनच तिला कुटूंबातील कोणत्याही सदस्यांकडून आपुलकी, प्रेम ,जिव्हाळा मिळालाच नाही. तिच्या वाटेला नेहमी फक्त तिरस्कार आणि शिव्याशापच आले. वडिलांकडून कधी जिव्हाळा नाही मिळाला. आईविना पोर एकटीच जीवन जगत होती. कोवळ्या वयात तिला घरकामांमध्ये जुंपले गेले. शिक्षणाची गोडी असूनही शिक्षणापासून वंचित राहिली.

या सर्वांमागे कारण काय….. तर. ती मुलगी होती… घरच्यांवर ओझं म्हणून जन्माला आलेली… मुलगा हवा या हव्यासापोटी तीन गर्भपातानंतर जन्माला आलेली …मुलगी..

मीराचे कुटुंब हे त्या गावातील तालेवार कुटुंबापैकी एक होते. घरातील फ़क्त पुरुष मंडळी शिक्षित होते. स्त्रिया मात्र अशिक्षित. मीराची आईसुद्धा अशिक्षित होती, त्यामुळेच चूल आणि मुलं या गोष्टींनाच संसार मानून जगणारी होती. यामुळेच वंशाला दिवा हवा( मुलगा) या साठी स्वतःच्याच रक्तामासाच्या मुलींचे जीव घेण्यास बळी पडली. वारंवार होणाऱ्या गर्भपातामुळेच मीराला जन्म देताच आईने प्राण त्यागले. घरच्यांना मात्र मुलगी झाल्याचा आनंद कमी दुःखच जास्त होत. आता झालीच तर तिला सांभाळावे तर लागणारच. यासाठी नाईलाजाने मीरचे संगोपन करणे त्यांना भाग पडले.

त्यानंतर ही घरच्यांची मुलगा व्हावा यासाठीची धफपड चालूच होती. मीराच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मीराची सावत्र आई स्वभावाने प्रेमळ होती. तिचे नाव माया ..मीराला तिने आईची माया दिली. प्रेम दिले. मीरा तिलाच आई म्हणू लागली. घरच्यांना मीराच्या आईने तिच्याशी प्रेमाने वागणे पटत नसे. ते नेहमी मीराला घरकामांमध्ये जुंपायचे. आईच्या प्रेमापासून तिला लांब ठेवले गेले. मात्र सावत्र आईला नेहमीच मीराबद्दल आपुलकी होती. ती मीरला स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवत असे.

कालांतराने , मीराची दुसरी आई म्हणजेच मायाच्या बाबतीतही तेच घडु लागले जे मीराच्या आईच्या बाबतीत घडले होते. मीरा तिच्या आईचे दुःख स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती. शेवटी तेच झाले…जे विधिलिखित होते. मीराच्या दुसऱ्या आईनेही एका गोंडस मुलाला जन्म दिला मुलगा झाल्याचा सगळ्या कुटुंबाला आनंद झाला. याच आनंदात गावागावांत साखर वाटण्यात आली, अन्नधान्य वाटण्यात आले. वंशाला दिवा मिळाल्याचा घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र याच दुःखाचा डोंगरही त्यांच्या कुटुंबावर कोसळला होता.मुलाला जन्म देताच आईने प्राण सोडले होते.

मीरा पुन्हा पोरकी झाली. माया सोडून घरातील कोणीच तिला आपलंसं मानत नव्हतं.तो आपुलकीचा हातही तिच्या डोक्यावरून गेला होता. यानंतर मात्र मीरा घरची मुलगी नव्हे ,तर मोलकरीण बनून जगत होती. ती घरची सर्व कामे करत असे. नेहमी घरच्यांची बोलणी ऐकत असे. पण ती नेहमीच सर्वांशी आदराने वागायची. तिची कोणत्याच बाबतीत तक्रार नसायची. आईनंतर मीरानेच बाळाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. मीराच्या वडीलांचीही तब्बेत दिवसेंदिवस खराब होत होती. त्यांची सेवाही मीरा आपुलकीनेच करत असे.

मीराने तिच्या लहान लहान भाऊ. प्रकाश चे संगोपन मोठी बहीण नव्हे तर आईप्रमाणे केली.दोघे बहीण-भाऊ एकमेकांच्या संगतीने मोठे होत होते. घरात मात्र कोणाच्याही स्वभावात बदल होत नव्हता. ते आजही मीरला आपली मानत नव्हते. प्रकाशचा मात्र मीरावर फार जीव होता. तिच्याबाबत वाटणाऱ्या थोड्या फार आपुलकीखातर का होईना वडिलांनी एका चांगल्या घरात तिचे लग्न जमवले. मीराच्या स्वभावगुणांमुळे तिला तिच्या मनाप्रमाणे प्रेमळ व समजून घेणारा जिवलग मिळाला.

आणि आज तोच दिवस….. मीराच्या नवीन सुखी प्रवासाची सुरुवात….

मैत्रीण

ज्या क्षणी त्या दिवशी मी तिला पाहिलं माझ्या परिसरात मी एकटाच होतो. फक्त मीच नव्हे तर कोणाचीही नजर अलगद तिच्याकडे वळेल अशी.. काही शाळकरी मुलांना रस्ता ओलांडताना मदत करणारी. बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्यानेही भुरळ घालणारी. अचानक भानावर आलो तर ती नजरेआड झालेली जाणवली. ती केव्हाच तिथून निघून गेली होती. मात्र मी तिथेच एकटक पाहत उभा होतो. तिच्या आठवणीत गुंग मी घरी परतलो.

काही दिवसांनी त्याच रस्त्यावर ती पुन्हा दिसली. त्या दिवशी मात्र मी तिच्या नकळत तिच्या घरापर्यंत पोहोचलो. आजूबाजूला वाहनांच्या हॉर्नचे कर्कश आवाज नेहमीच ऐकू येतील, माणसांची वर्दळ नेहमी पाहायला मिळेल, तीच बायकांची पाणी भरण्यासाठी रांगेत लागलेली भांडण, कामावर जाण्यासाठी झालेली घाई गडबड पाहायला मिळेल , मात्र या सगळ्या गडबडीत लहान मुलांनी भरलेल्या खेळकर अशा चाळीत ती राहायची. तिला येताना पाहताच मुलांनी तिला गोल घेर घातला व चॉकलेट, चॉकलेट ओरडू लागली. तिनेही सर्वाना प्रेमाने कुरवाळत पिशवीत आणलेले चॉकलेटस वाटले व घरात गेली. मी हे सर्व दृश्य चाळीच्या बाहेरून लांबून पाहत होतो. आता हा माजा रोजचा दिनक्रम झाला होता. घरून निघालो की पहिलं इथे यायचं तिला डोळे भरून पाहायचं व नंतर पुढील कामाला जायचं.

एके दिवशी मी नेहमीप्रमाणे चाळीबाहेर उभा होतो मात्र ती दिसलीच नाही. मी सगळीकडे नजर फिरवुन पहात होतो. ती मात्र अचानक माझ्या समोर यरुन उभी राहिली. माझी चोरी पकडली गेली अशा भावात मी मान खाली घालून उभा होतो. ती मला पाहताच हसू लागली व म्हणाली ” तू रोज इथे येतोस ना? कारण कळू शकेल..” मी चाचपत चाचपत उत्तर दिलं, ” नाही .. नाही.. असच..ते….. ( आठवत) हा .. माझ्या मित्राला भेटायला आलो होतो. ती पुन्हा हसू लागली. ती न रागावता मला तिच्या घरी घरून गेली.तिच्या घरात कोणीच नव्हतं . बहुदा ती एकटीच राहत असावी. मी तिला फार काही न विचारात शांत बसून होतो. तिने मला चहा प्यायला दिला व माझ्याशी गप्पा मारू लागली. मला वाटलेलं की कदाचित ती रागावली असावी मात्र तसं काहीही नव्हतं. उलट त्या दिवशी आमची मैत्री झाली . गप्पांना रंगत आली होती.

अनोळखी पणाने ही आमच्यात मैत्रीचं नवं नात फुलत होतं. तिच्या घरी माझ रोज येणं- जाणं होत असे. रोजच्या गप्पा गोष्टी, एकमेकांचे सुख-दुःख सांगता सांगता कधींही न तुटणार असं.. मैत्रीचं नात आमच्यात तयार झालं. एके दिवशी सकाळी ,मी तिच्या घरी आलो. घरी पोहोचलो तर ती अंथरुणावर झोपलेली होती. तिचा अंगात ताप होता. हात लावताच चटका बसेल इतका.. मी तिला घेऊन डॉक्टरांकडे आलो. तपासून झाल्यावर डॉक्टरांनी मला औषधांची पावती दिली व म्हणाल्या, ” यांची फार काळजी घ्यायाची गरज आहे? कारण… ” डॉक्टर पुढे बोलणार इतक्यात तिने अडवले व म्हणाली ,” मला डॉक्टर सोबत बोलायचं आहे तू बाहेर थांब.” मी तिथून बाहेर आलो. पण डॉक्टर मला काय सांगणार होत्या या विचाराने अस्वस्थ होतो. काही काळजीच कारण तर नाही ना? तिला काही जाणार तर नाही ना? असे विचार सारखे मनात घोंगावत होते. मी दरवाजत उभा राहून त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न केला तर ऐकू आले, ” तुम्ही काळजी घ्या? अजून फक्त काही दिवस बाकी आहेत?”

डॉक्टर असे का म्हणाले असतील या विचाराने मी गडबडलो होतो. ती बाहेर येताच तिला विचारण्याचा प्रयत्न केला. ” काय म्हणाले डॉक्टर.. काही काळजीच कारण तर नाही ना” तिने नकारार्थी मान हलवली. पुढे मात्र रस्त्याभर ती गप्पच होती.मी घरी परतलो. मात्र तिच्या काळजीने झोप ही धड लागेना. अस्वस्थ बसून होतो.

आज .. आजचा संपूर्ण दिवस मला तिच्यासमवेत घालवायचा होता. कारण आज माझा वाढदिवस आहे.मी आनंदाने तिच्या घरी पोहोचलो. मात्र घराला कुलूप…. आजूबाजूला विचारपूस करता समजले की ती कालच चाळ सोडून निघून गेली. कुठे गेली? का गेली? कोणालाच ठाऊक नव्हते. दिवसभर तिला शोधत फिरलो. मात्र ती नाही सापडली. हिरमुसलेल्या चेहऱ्याने मी घरी परतलो. पाहतो तर आईबाबांच्या ही चेहऱ्यावर दुःखाचे ठसे उमटलेले.

मी स्वतःला सावरलं व आई बाबांकडे गेलो. ते का रडत आहेत? हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.तेव्हा आई बाबांनी मला एक सत्य सांगितलं. आयुष्याला नवी कलाटणी देणार सत्य… ते म्हणाले,” सोहम , आम्ही तुला काय सांगतोय ते नीट ऐकून घे. तू आमचा मुलगा नाहीस. आम्ही तुझे पालनाकर्ते फक्त.. तुझे काका- काकू. तुझ्या जन्मावेळी तुझ्या आईला कॅन्सर असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. आईला कॅन्सर असल्याने बाळाला( तुला) त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून तुझ्या आईने तुला आमच्या हाती सुपुर्त केलं व तुझ्यापासून दूर झाली. गेली 15 वर्षे ती तुझ्यापासून लांब आहे. ती आम्हालाही कधीच भेटली नाही. आज आम्हाला तुझी आई मिळाली मात्र तिच्या अखेरच्या श्वासात………..” इतके बोलुन ते रडू लागले.

आईने कपाटातून एका व्यक्तीच्या फोटो आणून माझ्याकडे दिला व म्हणाली,” ही तुझी आई..”फोटो पाहतच मी गडबडलो, ” आई……..” जिला मी रोज भेटायचो.. तिच्याशी बोलायचो.. माझे सगळे सुख-दुःख सांगायचो ती माझी सर्वात जवळची मैत्रीण माझी आई होती. माझी आई .. माझी मैत्रीण..

अदृश्य असे दृश्य…

आज अचानक गावची खूप आठवण आली. आपलं गाव कास आहे?तेथील वातावरण, तेथील माणसे.. कसं असेल..? हा प्रश्न नेहमीच पडायचा. बाबा नेहमीच मला गावाकडच्या गोष्टी सांगत असतं. माझ्या दिवसाचा सूर्योदय हा गावच्या कल्पनेने व्हायचा आणि सूर्यास्त ही.. रोज एक नवीन किस्सा ऐकूनच मी झोपी जायचे. मात्र मला गोष्टी सांगताना बाबा त्यांच्या आठवणीत गुंगायचे.

बाब सांगायचे, पंधरा वर्षांपुर्वी आई व ते उद्योगधंद्याच्या शोधत शहरात आले. शहरातील या गोंधळी जीवनात गावची आठवण मात्र कायमच त्यांच्या मनात राहिली. कामाचा व्याप व घराची जबाबदारी यांमुळे पुन्हा गावी येणे कधी जमलेच नाही. पण आता माझ्या हट्ट पुरवण्यासाठी… आणि त्यांच्या आनंदासाठी गावी जायचे ठरले.

आई बाबांपेक्षाही मला गाव पाहण्याची जास्त उत्सुकता लागली होती. संपूर्ण प्रवासात गावच्या कल्पनेत रमलेले.. मी. बाबा सांगायचे, आमचे गावाला मोठे घर आहे. घराच्या चारही बाजूंनी हिरवळ रान.. आणि बलदंड मोठं वडाचे झाड.. ज्यावर लहानपणी ते झोका बांधून खेळत व झाडाच्या सावलीत शांतपणे झोपी जात. घरापर्यंत पोहोचण्याआधीच तेथील दृश्य कसे असेल हे मला नजरेसमोर दिसत होतं.

पाहता पाहता आम्ही गावच्या वेशीवर यरुन पोहोचलो. वेशीजवळुन घरी पोहोचायला 2 किमी अंतर होते. तेवढे अंतर चालत जावे लागायचे. शाळेतून घरी जाताना बाब याच रस्त्याने जात व वाटेतील झाडांवर चढून बोर, पेरु पाडून खात. पण आता मात्र तेथे काहीच नव्हतं.. अगदी सामसूम रस्ता.. कदाचित अंधार असल्याने काही दिसत नसावं, असा विचार करून आम्ही पुढे चालू लागलो.

चालून – चालून माझे पाय दुखू लागले. थोडी विश्रांती घेऊयात म्हणून आम्ही थांबलो. समोरच एक झोपडी दिसली. झोपडीत संपूर्ण अंधार होता. काही माणसे बाहेर शेकोटी पेटवून बसली होती. पण आश्चर्यच आम्हाला पाहताच ते चटकन झोपडीत पळाले. आम्ही पुन्हा चालू लागलो. थोडे अंतर चालत जाताच अचानक मागून कोणी तरी पळत असल्याचा आवाज आला. आम्ही मागे वळून पाहिले तर ते लोक हातात काठी घेऊन आमचाच पाठलाग करत होते. मला तर काय चाललंय हेच कळत नव्हतं. आम्ही जीव वाचून पळू लागलो. रात्रीच्या त्या काळोखात गावात पळापळीला जोर चढला होता. पळत पळता आम्ही एके ठिकाणी येऊन थांबलो. कारण त्या ठिकाणी आम्हाला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता. आमचा पाठलाग करणारी माणसेही तिथे जाताना पाहताच मागे फिरली. पण इथे आम्हाला जीभ गुदमरल्यासारखं वाटत होतं. एकामागोमाग एक आई व बाबा भोवळ येऊन खाली पडले. मी त्यांना उठवण्याचा प्रयन्त केला मात्र त्याच क्षणी कोणीतरी माझा गळा दाबून धरल्याने जाणवून मी दचकले. खूप घाबरले. एक छाया माझ्या अंगावर पडली होती. अदृश्य … उंचच उंच.. तिचे हात माझ्या गळ्याशी.. माझा श्वास कोंडला जाऊन मी सुद्धा जमिनीवर कोसळले.

सूर्योदय होताच सुर्यकिरणांचा प्रकाश माझ्या डोळ्यावर पडला. मला शुद्ध आली. नजर फिरवून चारही बाजूंनी पाहिले तर आश्चर्यचा धक्काच बसला. गावाबद्दल असा विचार तर मी कधीच केला नव्हता.मी घाईघाईने आई बाबांना जागे केले. बाबाही अचंबित होऊन पाहत राहिले. आमच्या चारही बाजूंनी मोठंच मोठं पसरलेलं मैदान आणि संपूर्ण मैदानात अर्धवट कापलेले झाडाचे खोड. जिथपर्यंत नजर जाईल .. तेथे हेच दृश्य. त्यातीलच एका खोडावर लिहिले होते,” हे तू ऐकलेलं गाव नाही” थोडयावेळासाठी आम्ही सुन्नच झालो.

इतक्यात आईचा आवाज आला, ” अग स्वरा, उठ लवकर ” मी दचकून जागी झाले. मनात प्रश्नांचा कल्लोळ… आपलं गाव खरंच अस असेल ? मला असं स्वप्न का पडावं ? आणि स्वप्नात दिसलेली ती सावली.. ते दृश्य…….?